Sunday, February 10, 2019

एका पावसाची कहाणी

एकदा बादशहाला कुणीतरी विचारलं, "सत्ताविसातून नऊ गेले तर किती उरतात?" बादशहाने बिरबलाला विचारलं तर तो म्हणाला "शून्य!"

बादशहा (नेहमीप्रमाणेच) चक्रावला आणि आकडेमोड करत बसला; पण उत्तर काही जुळेना. शेवटी बिरबलानेच सांगिंतलं, "एकूण नक्षत्रे सत्तावीस, त्यातील पावसाची नऊ. जर पाऊसच पडला नाही तर उरणार काय?"

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

मे महिन्यातला सूर्य अख्ख्या भारतवर्षाला जाळत होता. धरतीची लाहीलाही होत होती. सगळे प्राणिमात्र तहानेने व्याकुळ झाले होते. अचानक आभाळ दाटून आलं आणि एका मुसळधार सरीने (काही काळापुरतं तरी) धरतीला शांत केलं. खरंतर मॉन्सूनला अजून अवकाश होता. पण मृगाच्या पावसापूर्वीच रोहिणीच्या सरीने हजेरी लावली. जणू भावाच्या जन्मापूर्वी झालेलं बहिणीचं आगमन!

भावाच्या आधी बहिणीचा पाळणा
मृगाच्या आधी रोहिणीचा गुळणा

बहिणीने हजेरी लावली खरी; पण थोड्यावेळापुरतीच. शेवटी माहेरवाशीणच ती. तिचं काम मधून-अधून भेट द्यायचं. खरं लक्ष दुसरीकडेच! ते काम धाकट्या भावाचं...

तो आला जूनच्या दुसऱ्या आठवड्यात. सगळं आभाळ ढगांनी व्यापून गेलं. हवा एकदम गार झाली आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर सरीवर सारी बरसू लागल्या. मृगाचं वाजत-गाजत आगमन झालं होतं!

घाटाच्या पश्चिमेला, निमुळत्या कोकणपट्टीत धबाबा तोय आदळू लागलं. कोसळलेल्या पाण्याचे लोंढे वसिष्ठी, सावित्री अशा नद्यांमधून समुद्राकडे परतू लागले.

इकडे घाटमाथे तर काळ्याशार दाट ढगांमध्ये गुरफटून गेले होते. धो-धो पडणाऱ्या पावसामुळे इथली सदाहरित जंगलं अधिकच हिरवीकंच होत होती. कोयनेच्या जंगलात जळवांचा बुजबुजाट सुरु झाला. भीमाशंकरची शेकरं, कोयना-चांदोलीची अस्वलं, राधानगरीचे गवे आणि आंबोलीचे साप पावसापासून लपायला आसरे शोधू लागले. इथेच उगम पावणाऱ्या कृष्णा, कोयना, भीमा, नीरा या पूर्ववाहिनी नद्या आता गढूळ पाण्याने भरून वाहू लागल्या आणि त्यांच्यावर बांधलेल्या धारणांपाशी थबकल्या.

मृग नक्षत्राबरोबर आता मॉन्सूनही पुढे सरकला. दख्खनच्या पठारावर अमृतधारा वर्षू लागल्या. इथला पश्चिम महाराष्ट्रातला पाऊस तसा हलकाच; पण हा प्रदेश कृष्णा, भीमेच्या कृपेने उन्हाळ्यातही तसा हिरवा होता. आता अधिकच हिरवा झाला.

तिकडे पूर्वेला विदर्भ उष्णतेच्या लाटांनी चांगलाच होरपळला होता. आता मात्र तिथे पावसाला सुरवात झाली. हा भाग भारतीय द्वीपकल्पाच्या मध्यावर; त्यामुळे कधी अरबी समुद्रावरून तर कधी बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे धुंवाधार पाऊस पडू लागला. वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, प्राणहिता या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. चंद्रपूर, गडचिरोलीची साग, साल आणि बांबूची जंगलं आता आणखीनच दुर्गम झाली.

जूनचा शेवट आला. एव्हाना आर्द्रा नक्षत्र सुरू झालं होतं. पण महाराष्ट्राचा एक मोठा पट्टा अजूनही कोरडाच होता, नाशिक-नगरपासून मराठवाड्यातपर्यंत पसरलेला. हे होतं गोदावरीचं खोरं.

गोदावरी तशी भली-मोठी पूर्ववाहिनी नदी. महाराष्ट्र, तेलंगाणा आणि आंध्र प्रदेशापर्यंत पसरलेली. पण कृष्णा-भीमेसारखं या नदीला 'खात्रीशीर' पावसाचं वरदान नसावं. या खोऱ्याच्या दक्षिणेला, लातूर परिसरात तर परिस्थिती आणखीच वाईट. सगळा प्रदेशच  पर्जन्यछायेचा.

तीच गत पश्चिमवाहिनी तापीच्या खोऱ्याची. खान्देशची काळी, कसदार जमीन जणू कापूस आणि केळ्यासाठीच बनलेली. पण इथला उन्हाळा विदर्भासारखा आणि पाण्याचं दुर्भिक्ष्य मराठवाडयासारखं! त्यामुळे सगळेच चातकासारखे पावसाची वाट पाहात होते.

सरते शेवटी जुलै उजाडला. पुनर्वसू नक्षत्र सुरु झाला आणि वरुणराज प्रसन्न झाला. गोदा आणि तापीही भरून वाहू लागल्या. खान्देश, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण, सगळीकडचं रान आबादान झालं.  अशातच पुनर्वसू, पुष्य, अश्लेषा नक्षत्रे सरली.

आता ऑगस्ट आला, म्हणजे मघा नक्षत्र. हा तर पावसाळ्याचा मध्य, सर्वात महत्वाचा. या नक्षत्राची एक गंमत आहे.

न पडतील मघा, तर ढगाकडे बघा
आणि पडतील मघा, तर चुलीपुढे ह*!

जेंव्हा मघा नक्षत्र कोरडं जातं, तेंव्हा आपल्या हाती फक्त आकाशाकडे बघायचं उरतं. आणि जेंव्हा धो-धो बरसतं, तेंव्हा? महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाणंही शक्य होत नाही! यावर्षी तसंच झालं! असो.

आता मात्र दिवस वेगाने पुढे सरकत होते. पूर्वा-उत्तरा नक्षत्रेही सरली. सप्टेंबरच्या शेवटी हस्त नक्षत्र आलं. मराठवाड्यात हत्तीच्या सोंडेतून दिल्यासारखा पाऊस पाडून गेलं. धरणं पूर्ण भरली. कोकणातला भात, पश्चिम महाराष्ट्रातला ऊस, मराठवाड्यातलं सोयाबीन, विदर्भातला कापूस आणि खान्देशातली केळी... सगळीकडे आबादी-आबाद झाली.

आता आला ऑक्टोबर. म्हणजे मॉन्सूनचा शेवट. पंजाब-राजस्थानातून परतीचं वारं वाहू लागलं. हे चित्रा नक्षत्र भातासाठी महत्वाचं.


न पडतील चित्रा, तर अन्न मिळेना पितरा
पडतील चित्रा, तर भात खाईना कुत्रा

पाऊस नाही पडला तर पिंडदानासाठीही भात मिळणार नाही. आणि पडला तर इतकं भरघोस पीक येईल की कुत्रासुध्दा भात खाऊन कंटाळेल. यावेळी मात्र पर्जन्यराजाने मनावरच घेतलं. भाताचं मायंदाळ पीक आलं.

पाऊस संपला, सुगी झाली. सगळीकडची दिवाळी आनंदात साजरी झाली. आणि पुन्हा एकदा त्याने धावती भेट दिली. यावेळी मात्र पुढच्या पिकांसाठी, रब्बीच्या. नक्षत्र होतं स्वाती आणि त्या पावसाने पिकवले माणिक-मोती!

अशा प्रकारे साठा उत्तराची पावसाची कहाणी पाचा उत्तरी पूर्ण झाली!

(माझ्याच दुसऱ्या ब्लॉगवरून पुनःप्रकाशित. लेखन: दिनांक 12 ऑक्टोबर 2016)

No comments:

Post a Comment